मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव आटू लागले आहेत. सध्या 25.66 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला असून महिनाभरात हा साठा 20 टक्क्यांपेक्षा खाली येणार आहे. त्यामुळे पुढील तीन-अडीच महिने मुंबईकरांना पाणी पुरवण्यासाठी 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे नियोजन केले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 2025 च्या तुलनेत 3 टक्क्याने पाणीसाठा जास्त असला तरी, पाऊस कधी पडेल हे सांगता येत नसल्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सध्या तलावांमध्ये 3 लाख 76 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.
मुंबई शहर व उपनगराला दररोज सरासरी 1 लाख 22 हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय या तलावांतून ठाणे व भिवंडी शहरालाही महिन्याला सरासरी 5 ते 6 हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे दररोज पाण्याचा सरासरी 1 लाख 30 हजार दशलक्ष लिटर इतका उपसा होतो. त्याशिवाय बाष्पीभवनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
सातही तलावांतील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता, कोणतीही कपात लागू न केल्यास जेमतेम दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. म्हणजेच जून अखेरपर्यंत हे पाणी पुरू शकते. त्यामुळे दोन महिन्यांत दहा टक्के पाणीकपात लागू करून दोन महिन्यांत 24 हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्याचे नियोजन आहे.
राखीव कोट्यातील पाणी घेण्याचेही नियोजन
तलावातील राखीव पाणी कोट्यामध्ये सुमारे दीड लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असतो. त्यामुळे यातील किमान 50 टक्के पाणी मुंबईला मिळावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन राज्य सरकारकडून राखीव कोट्यातील पाणी वापरण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.
मागील तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
5 मे 2024 - 2,53,891 (17.54 टक्के)
5 मे 2025 - 3,28,041 (22.66 टक्के)
5 मे 2026 - 3,71,324 ( 25.66 टक्के)