मुंबई : अमर महल भूमिगत बोगद्याला जोडलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी केलेली पाणीकपात बुधवारी दोन दिवसांनी मागे घेतल्यानंतर महानगरपालिकेने आता पाणीकपातीचा नवा मुहूर्त जाहीर केला आहे. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने सोमवार, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवार, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात करण्यात येणार आहे.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्याकामी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे 15 टक्के घट होणार आहे.
परिणामी मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग ; पश्चिम उपनगरांतील एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरांतील एन, एल आणि एस विभाग अशा एकूण 17 प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली जाणार आहे.
बुधवार, दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवार, दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात लागू करण्याचे प्रस्तावित होती, तथापि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सदर जलवाहिनीचे काम पुढे ढकलून 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली.
आता सोमवार, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मंगळवार, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परिणामी एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात लागू राहणार आहे.