मुंबई: मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमध्ये मुंबई शहर व उपनगरातील मुळ १ कोटी मतदार संख्येतून ३० लाखांपेक्षा जास्त नावे कमी झाली आहेत. यात मृत व स्थलांतरित मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. चांदिवली मतदारसंघात सर्वाधिक घट असून कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये ४६.९ टक्के इतकी घट असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसआयआर मोहीम पूर्ण झाली असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये मुंबईतील लाखो मतदारांची नावे वगळल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये म्हणजेच चांदिवली, कुलाबा, मानखुर्द शिवाजीनगर, मालाड पश्चिम आदींसह अन्य मतदारसंघांत सुमारे १३ लाख मतदार गहाळ झाले आहेत.
मागील मतदार यादीची तुलना केल्यास सुमारे ३५ टक्केपेक्षा जास्त मतदारांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. चांदिवली मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची घसरण झाली आहे, तर कुलाबामध्ये ४६.९ टक्के घट झाली आहे.
एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळले जाणार नाही व कोणतीही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार हे मुख्य धोरण असल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान मृत अथवा इतरत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ भरून घेण्यात आला आहे.
यात कोणी कोणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याचे निर्देशही निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत. मतदारांना दावा व आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले.