मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा रविवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून भाऊचा धक्का येथून या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली.
फेरी सुरू होण्यापूर्वी मालवणी पद्धतीप्रमाणे पानाचे विडे काढले गेले. कोकणातील प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी बोटीच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री नितेश राणे यांच्यासमवेत खास मालवणीत गाऱ्हाणे घालून प्रवासाचा श्रीगणेशा केला.
बोट सुरू होताच प्रवासाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. बुवा प्रमोद धुरी यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून भजनाचा कार्यक्रम सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हरिनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि प्रवासी भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले.
ही रो-पॅक्स सेवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पायाभूत सुविधा आणि सागरी विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.