Mumbai Vegetable Price Hike Pudhari
मुंबई

Mumbai Vegetable Price Hike: मुंबई बाजारात भाजीपाला महागला! उन्हामुळे आवक घटली

दोडका,कारले,दुधी भोपळ्याच्या दरात वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, मुंबईतील किरकोळ बाजारात प्रतिकिलो भाज्यांचे दर सरासरी 15 ते 20 रुपयांनी वाढले आहेत, तर काही भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

सध्या फरस बी,वालपापडी, दोडका, कारले,दुधी भोपळा,मेथीसह तोंडली, टोमॅटो,काकडीच्या दरात वाढ झाली असल्याचे दादर येथील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे.परिणामी;भाजीपाल्याचे उत्पादन घटत आहे.उत्पादन घटल्याने शेतकरीही चिंतेत आहे.शेतीचा खर्च यातून निघत नसल्याची स्थिती आहे.

मुंबई शहरात दादर,भायखळा, तर उपनगरात बोरिवली,मालाड,गोरेगाव,अंधेरी,सांताक्रूझ या परिसरात मोठे भाजीपाल्याचे बाजार आहेत.

याठिकाणी नवी मुंबई येथील बाजार समिती, ठाणे,पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वप्रकारच्या भाज्यांची दैनंदिन आवक मुंबईत होते.ग्रामीण भागातून होणारी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

यापूर्वी ग्राहकाला भाजी खरेदीसाठी 100 रुपये लागायचे,आता त्याला 150 ते 200 रुपये मोजावे लागतात. याचबरोबर टोमॅटो प्रतिकिलो 30 रुपयांवरून 50 रुपये, हिरवी मिरची 50 रुपयांवरून 60रुपये झाली आहे.दरम्यान,गवारची आवक जास्त असल्याने दरात घट झाली आहे.गवार प्रतिकिलो 100 रुपयांवरून 50 ते 60 रुपयांच्या घरात गेली असल्याचे भाजी विक्रेत्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT