मुंबई : सुट्टीचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणपती मंडळाच्या निघालेल्या आगमन मिरवणूका, नारळी पौर्णिमेचे कार्यक्रम पाहण्यासाठी तसेच ईदनिमित्त नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे कोळीवाडे -चौपाट्या अक्षरश: गर्दीने फुलून गेले होते. त्याचा परिणाम म्हणजे गुरुवारी भायखळा, लालबाग, दादर, माहीम आणि कुर्ला, सायन -धारावी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
संध्याकाळी गर्दी वाढल्याने मुंबईतील अनेक भागात अभूतपूर्व वाहतूककोंडी पाहायला मिळाली. मुंबई शहरातील वरळी, दादर, परेल आणि माहीम परिसरात मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. त्यामुळे येथील कोळीवाडे -चौपाट्यांवर सकाळपासूनच गर्दी होत होती. त्यामुळे दादर, शिवाजी पार्क, वरळी सेन्चुरी, प्रभादेवी सिद्धिविनायक, माहीम काजवे येथील रस्त्यावर वाहनांची कोंडी निर्माण झाली.
वरळी कोळीवाड्यात होणारी गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनी काही मार्गात बदल करून विशेष बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरी सुद्धा या परिसरात रस्त्यावर वाहनांची कोंडी दिसून आली. माहिम-काजवे परिसरात ईदनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांनी माहीम दर्गा आणि भायखळा येथे कोंडी निर्माण झाली होती. काही सार्वजनिक गणपती मंडळाने आगमन मिरवणूका आयोजित केल्या होत्या. त्यामुळे लालबाग, काळाचौकी तसेच परेल, भोईवाडा परिसरातील रस्त्यांवर वाहन कोंडी दिसून येत होती.
चालकांनी सुट्टी घेतल्याने रिक्षा-टॅक्सी मिळणे झाले कठीण
कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक, नेहरू नगर, वांद्रे कुर्ला संकुल, धारावी अशा मुस्लिम बहुल परिसरात बुधवारी आणि गुरुवारी ईद साजरी करण्यासाठी अनेक भागात जुलूस निघाले होते. तसेच मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव घराबाहेर पडल्याने रस्त्यावर कोंडी निर्माण झाली होती. ईद निमित्त हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांनी सुट्टी घेतल्यामुळे कुर्ला, बीकेसी, बांद्रा, धारावी, गोवंडी, मानखुर्द परिसरात नागरिकांना रिक्षा टॅक्सी मिळणे कठीण झाले होते. अशा वाहतूक कोंडीतून मार्ग काढत मुंबईकरांना गुरुवारी घर गाठावे लागले.