मुंबई : मुंबईसह राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार अमीन पटेल, हारून खान यांच्यासह अनेक आमदारांनी यासंदर्भात राज्य सरकारला तातडीने याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली. पटेल यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव सूचना मांडली त्यावर विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला याप्रकरणी गंभीर दखल घेत कार्यवाही करण्याची सूचना केली.
यावेळी अमीन पटेल म्हणाले की, महाराष्ट्र वाहतूक कृती समितीकडून राज्य सरकारला देण्यात आलेल्या निवेदनात मुंबईत चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारकडून 2017 रोजी ई चलान ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तीन फोटो आणि पुरावा असणे अनिवार्य आहे. 90 दिवसांच्या आत पुरावा
न मिळाल्यास हे चलान रद्द करण्याचा निर्णय आहे. मात्र त्यानंतरही सरार्सपणे कारवाई सुरु आहे. आज अनेक गाड्यावर लाखो रुपयांचा दंड आहे. 4 हजार 500 करोड रुपयांचे चलन प्रलंबित असून त्यापैकी 3 हजार 500 कोटींचे चलन हे व्यावसायिक वाहनांवर असून उर्वारित 1 हजार कोटी दंड खासगी वाहनांवर आहेत. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याबाबत अमीन पटेल यांनी लक्ष वेधले.