मुंबई: कमाल तापमानामध्ये किंचित घट अपेक्षित असल्याने मुंबईसह आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव होणार कमी होण्याचा अंदाज आहे.
सलग सहा दिवस मुंबईत यलो अलर्ट कायम होता. सहाव्या दिवशी, गुरुवारी 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
मुंबई आयएमडीच्या साप्ताहिक फोरकास्टनुसार, पारा पस्तीशीच्या खाली येईल. मागील सहा दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात थेट 2 अंशांनी घट होऊ शकते. वीकेंडला सरासरी 33 अंश सेल्सिअस तापमान राहील, असा अंदाज आहे.
राज्यात तापमानाचा पारा वाढलेलाच
पुणे : देशातील बहुतांश राज्यांत अवकाळी पाऊस सुरू असून, मार्चअखेरपर्यंत तो सुरू राहणार आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील पाऊस ओसरला असून, पुढील आठवड्यात मात्र पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भात अवकाळीबरोबरच कमाल तापमानाचा पारा वाढत असून, गुरुवारी अकोल्यात 41.8 अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात विदर्भात पाऊस
विदर्भात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. देशातील कमाल तापमानही सर्वाधिक विदर्भातच नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, कोकणातील उष्ण व दमट हवामानही कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.