मुंबई : समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतचे पाणी दूषित होत असल्याकडे लक्ष वेधत यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपायोजना हाती घेऊन, समुद्रात जाणारे सांडपाणी व कचरा रोखून मासे व अन्य जलचरांना जीवदान द्या, अशी मागणी मंगळवारी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी समुद्रात सोडण्यात येते. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या समुद्राचे पाणी दूषित झाले असून जलचर, वनस्पती, जीवसृष्टी यांना धोका निर्माण झाल्याचा चिंतामणी निवाटे यांनी महापालिका सभागृहात प्रस्ताव मांडला. यावेळी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली. शिवसेना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांनी आपण महापौर असताना नेव्ही अधिकाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली असता, समुद्र किनाऱ्यालगतचे पाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसून आले.
आजही तीच परिस्थिती असल्याचे राऊत त्यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे किनाऱ्यालगतची मासेमारी बंद करायची वेळ कोळी बांधवांवर आली आहे. त्यामुळे मासेमारीवर अवलंबून छोट्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात शिंपल्या मिळत होत्या. पण आता या शिंपल्यांचे प्रमाण कमी झाल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले.
समुद्रात सांडपाण्याच्या वाहिन्या थेट सोडण्यात आल्याने घाण पाणी समुद्रात पसरत आहे. समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही.