मुंबई : मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना जानेवारीपासून पोषण आहारात देण्यात येत असलेले न्यूट्रिशन बार (चॉकलेट) वादात सापडले आहे. त्यात काचा, प्लास्टिक व दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार विधानसभेत समोर आल्यानंतर त्याचे पडसाद मंगळवारी मुंबई महापालिका सभागृहातही उमटले. हे न्यूट्रिशन बार विद्यार्थ्यांसाठी पोषख नसून अपायकारक आहे. त्यामुळे त्यावर कायमची बंदी घाला, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत हा विषय मांडला होता. त्यानंतर महापालिका सभागृहात मंगळवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी हा विषय मांडला.
माजी महापौर तथा विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मुदत संपलेली न्यूट्रिशन बार पुरविली जात असल्याचा आरोप करीत असे जीवघेणे धंदे थांबावा, अशी मागणी केली. शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढत कंत्राटदारांसह संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी न्यूट्रिशन बारचे उत्पादन हे भिवंडी येथे होते. आपल्याला भिवंडी किती भयानक आहे, हे माहीत आहे. यामुळे याची प्रयोगशाळेत प्रत्येक महिन्याला तपासणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत दर्जेदार, नामांकित कंपनीकडूनच याची खरेदी करावी,अशी मागणी केली. इस्कॉनची खिचडी पुन्हा सुरू केली तर बरे होईल, अशी अपेक्षा नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी व्यक्त करीत बिस्कीट, शेगदाणेही सुरू करा, अशी मागणी केली आहे.
महानगरपालिका शाळेतील बालवाडी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना न्यूट्रिशन बार हे जानेवारी 2026 पासून वाटप केले जात आहे. ते आठवड्यातून दोन वेळा दिले जात आहे. लहान मुले ते खात आहेत. मात्र मोठी मुले फेकून देत असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले.
ही केंद्र सरकारची योजना असून याचे कंत्राट एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकडे आहे. यामुळे नगरसेवकांची आक्रमता कायम राहते का? हे कंत्राट रद्द होते का? याकडे पालिका शाळेतील शिक्षकांसह पालकांचे लक्ष लागून आहे.