Mumbai - Pune Expressway Traffic Jam: इंजिन गरम होऊन गाड्या ब्रेकडाऊन.. पिण्याच्या पाण्याची कमतरता, मुले ज्येष्ठांचे हाल सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाहनांच्या न संपणाऱ्या रांगा लागल्या असून लोणावळा घाटात भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या पाच ते सहा तासांपासून प्रवासी घाटात अडकून पडले असून, कडक ऊन आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
खालापूर टोलनाक्यापासूनच या कोंडीला सुरुवात झाली आहे. घाटातील तीव्र चढावावर तासनतास 'हाफ क्लच'वर गाड्या चालवाव्या लागत असल्याने अनेक गाड्यांची इंजिनं गरम होऊन त्या बंद पडू लागल्या आहेत. विशेषतः इलेक्ट्रिकल वाहनांच्या (EV) बॅटरीची मर्यादा संपण्याची भीती असल्याने अनेक चालकांनी वाहने बाजूला उभी करणे पसंत केले आहे. फूड मॉल्सची पार्किंगही पूर्णपणे हाऊसफुल्ल झाली आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून २५-२५ मिनिटांचे ब्लॉक घेतले जात आहेत. दरम्यान, आज दुपारी १ वाजता होणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या उद्घाटनामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करत प्रवाशांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. हे उद्घाटन सकाळीच उरकायला हवे होते किंवा अशा वेळी योग्य उपाययोजना करायला हव्या होत्या, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.