मुंबई: गेल्या दोन वर्षांत संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. मुंबईतील सरासरी निवासी मालमत्तेचा दर २०२४च्या दुसऱ्या तिमाहीत प्रति चौरस फूट २६ हजार ७८० वरून २०२६च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रति चौरस फूट ३८ हजार १०० पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच घरांच्या किमती ४२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
पहिल्या तिमाहीत २०२५ मध्ये प्रति चौरस फूट ३० हजारांचा टप्पा पार केल्यानंतर तिसऱ्या तिमाहीत २०२५ पर्यंत हा दर प्रति चौरस फूट ३७ हजारांच्या पुढे गेला होता. मुंबई महानगर प्रदेशात लहान आणि मध्यम आकाराच्या घरांना सर्वाधिक मागणी कायम आहे.
मात्र, परवडण्याच्या दृष्टीने मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये स्पष्ट तफावत दिसून येते. मॅजिकब्रिक्सच्या प्रॉपइंडेक्स एएमजे २०२६ अहवालातून ही बाब समोर आली आहे.
सागरी किनारा मार्ग, मुंबई मेट्रोचा विस्तार आणि ट्रान्स हार्बर लिंक यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बळावर मुंबईने भारतातील सर्वाधिक सक्षम आणि पसंतीची निवासी बाजारपेठ म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे, असे मॅजिकब्रिक्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर प्रसून कुमार यांनी सांगितले.
किमतींच्या दृष्टीने पाहता, मुंबईच्या निवासी बाजारपेठेत दीड कोटी ते ३ कोटी या किंमत श्रेणीतील घरांचा सर्वाधिक वाटा असून, या गटात ३३ टक्के मागणी आणि ३४ टक्के पुरवठा आहे. तसेच, ३ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या घरांसाठी २० टक्के मागणी नोंदवली गेल्याने आलिशान घरांची मागणी कायम असल्याचे दिसते.
याउलट, नवी मुंबई आणि ठाणे या बाजारपेठा अजूनही परवडणाऱ्या घरांच्या मागणीवर आधारित आहेत. नवी मुंबईत ७५ लाखांपर्यंतच्या घरांचा मागणीत ५५ टक्के वाटा असून, ठाण्यात हा वाटा ४० टक्के आहे.
मात्र, या दोन्ही बाजारपेठांमध्ये विकासकांचा पुरवठा प्रामुख्याने दीड कोटी ते ३ कोटी किंमत श्रेणीतील घरांकडे झुकलेला आहे. यावरून परवडणाऱ्या घरांची मागणी आणि बाजारात उपलब्ध असलेल्या घरांच्या साठ्यामध्ये अजूनही लक्षणीय तफावत असल्याचे स्पष्ट होते.
कारणे काय ?
मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाचा समान धागा म्हणजे पायाभूत सुविधांचा सातत्याने होणारा विकास. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील पुनर्विकास प्रकल्पांमुळे नव्या घरांचा पुरवठा वाढत आहे, तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रोचा विस्तार आणि प्रस्तावित नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी यांसारखे प्रकल्प नवी मुंबईतील निवासी घरांच्या मागणीला आणखी बळ देण्याची अपेक्षा आहे.
ठाण्यात, ठाणे–भिवंडी–कल्याण–उल्हासनगरला जोडणाऱ्या मेट्रो मार्ग ५ च्या प्रगतीमुळे तसेच घोडबंदर रस्त्याच्या उन्नतीकरणामुळे संपर्क सुविधा अधिक सक्षम होत असून, प्रदेशाच्या पूर्वेकडील भागांमध्ये दीर्घकालीन निवासी घरांच्या मागणीला चालना मिळत आहे.
१ बीएचके घरांची कमतरता
मुंबईत २ बीएचके घरे सर्वाधिक पसंतीची ठरली असून, एकूण मागणीपैकी ४४ टक्के आणि पुरवठ्यापैकी ४१ टक्के वाटा या प्रकारच्या घरांचा आहे, तर १ बीएचके घरांसाठी ३४ टक्के खरेदीदारांची मागणी असली तरी उपलब्ध पुरवठा केवळ १२ टक्के असल्याने या श्रेणीत लक्षणीय तूट दिसून येते.
नवी मुंबई आणि ठाणे येथे १ बीएचके आणि २ बीएचके घरांचा एकत्रित वाटा दोन्ही बाजारपेठांतील सुमारे ८७ टक्के खरेदीदारांच्या मागणीचा आहे. मात्र, विकासकांचा भर प्रामुख्याने २ बीएचके आणि ३ बीएचके घरांच्या पुरवठ्यावर असून, नवी मुंबईतील एकूण उपलब्ध घरांपैकी सुमारे ७७ टक्के आणि ठाण्यातील ७४ टक्के घरे या दोन प्रकारांतील आहेत.