मुंबई : जहाजे उभी राहण्यासाठी नवीन जागा निर्माण करणे, आधुनिकीकरण, संपर्क सुविधांचा विस्तार, किनारपट्टी भागाचा विकास करणे, माल हाताळण्याची बंदराची क्षमता वाढविणे अशा ३५४१ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा मुंबई पोर्ट ऑथॉरिटीने (एमपीए) गुरुवारी केली.
बंदराच्या १५४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. नियोजित प्रकल्पांव्यतिरिक्त, ऑथॉरिटीकडे १३२.२९ कोटी रुपयांचे सात प्रकल्प उद्घाटनासाठी आणि १,३५४.५९ कोटी रुपयांचे ३४ प्रकल्प पायाभरणीसाठी सज्ज आहेत.
प्रमुख प्रकल्पांमध्ये इंदिरा डॉक येथील बर्थचे आधुनिकीकरण, माल साठवणूक पायाभूत सुविधांचा विस्तार, संपर्क सुविधा सुधारणे, कच्च्या तेलाच्या बर्थचा विस्तार, छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवणे, पाळत ठेवण्याची प्रणाली (सर्व्हिलन्स सिस्टिम्स) आणि डिजिटलायझेशन प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच, पर्यटन आणि मनोरंजनात्मक उपक्रमांना चालना देण्यासाठी 'मुंबई मरिना' हा वॉटरफ्रंट प्रकल्प विकसित करण्याची योजनाही बंदराने मांडली आहे.
क्रूझ वाहतूकीतही मुंबई पुढे...
मुंबई बंदर भारताच्या क्रूझ वाहतुकीपैकी ६६ टक्क्यांहून अधिक वाहतूक हाताळते. येथे दरवर्षी १०० हून अधिक क्रूझ जहाजे येतात. वर्षाला सुमारे ३ लाख प्रवासी या बंदराचा वापर करतात. पुढील चार ते पाच वर्षांत हा आकडा १० लाखांवर जाईल. मुंबई मरिना म्हणून या बंदराचा विकास केला जाईल. त्यासाठी ४७० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पर्यटन व व्यवसाय वाढीस चालना मिळेल.
साडेसात कोटी टन मालाची हाताळणी...
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, मुंबई बंदराने ७.५१५ कोटी टन मालाची हाताळणी केली. गतवर्षीच्या तुलनेत त्यात साडेनऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई बंदराद्वारे हाताळण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक माल-हाताळणी ठरली आहे. देशातील सर्व प्रमुख बंदरांच्या एकूण माल-हाताळणीत या बंदराचा वाटा ८.२२ टक्के आहे. लोखंड आणि पोलाद (आयात-निर्यात) मालामध्ये ३५ टक्के मालवाहतूक याच बंदरातून होते. याशिवाय द्रव स्वरूपातील वाहतुकीत १५.५ टक्के आणि किनारपट्टीवरील व्यापारात १०.४८ टक्के बाजारहिस्सा या बंदराचा होता. येत्या काळात ८ कोटी टन माल हाताळण्याचे उद्दिष्ट आहे.