मुंबई: इराणच्या युद्धाने निर्माण केलेल्या टंचाईमुळे मुंबईकर आणि मुंबईतील हॉटेल्स त्रस्त असतानाच शासकीय पातळीवर सुरू झालेल्या पाईप गॅस कनेक्शनच्या सक्तीने इतक्यात हा प्रश्न सुटणे अशक्य दिसते.
कारण, मुंबईत रोज सिलिंडरसाठी जशा रांगा लागतात तशाच अर्जांच्या रांगा पीएनजी कनेक्शनसाठी लागलेल्या असून, या अर्जांची संख्या चार पट वाढल्याने यंत्रणेलाही मर्यादा येऊन पडली आहे. परिणामी, काही भागांत नव्या पीएनजी कनेक्शनची प्रतीक्षा किमान तीन महिने, तर काही भागांत ती तब्बल एक वर्षाची आहे.
युद्धाच्या तडाख्यात सिलिंडर गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आणि रिकामे सिलिंडर घेऊन मुंबईकरांवर रात्रंदिवस रांगेत बसण्याची वेळ आली. या धांदलीत बिनधास्त राहिले पीएनजी गॅस कनेक्शन असलेले मुंबईकर. त्यांच्या घरात पाईपने पुरवला जाणारा गॅस किंचितही विस्कळीत झाला नाही.
केंद्रानेही मग पीएनजीकडे वळा, पीएनजी पुरवणे अधिक सोयीचे आहे, अशी हाक राज्यांना दिली. त्यानुसार महाराष्ट्रानेही ही मोहीम पुढे नेत सिलिंडर सरेंडर करून पीएनजी घेण्यास तीन महिन्यांची मुदतच देऊन टाकली. या मुदतीत आहे तो सिलिंडर परत करता येईल, मात्र पीएनजी कनेक्शन मिळेलच असे नाही.
महानगर गॅस लिमिटेडच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत घरगुती पाईप गॅसच्या नव्या कनेक्शनसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये एकट्या मार्च महिन्यात तब्बल 200 टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये या अर्जांची संख्या 16 हजार होती. मार्चमध्ये ती 50 हजारांवर पोहोचली. रोज होणाऱ्या चौकशीचे प्रमाणही चार ते पाच टक्के वाढले आहे.
पीएनजी कनेक्शनची परवानगी मिळेल या आशेने मुंबईच्या अनेक निवासी संकुलांमध्ये पीएनजीसाठीचे पायाभूत जाळे आधीच टाकलेले आहे. मात्र अखेरच्या टप्प्यातील कनेक्शन जोडले जाण्यात अनेक अडचणी येतात. परिणामी, इमारतीच्या आसपास आलेला पीएनजी स्वयंपाकघरात मात्र पोहोलेला नाही.
या अडचणी कोणत्या? कुठे नाला आडवा येतो, कुठे महापालिकेच्या पायाभूत सुविधांची कामे सुरू असतात, कुठे वाहतुकीच्या अडचणी, तर कुठे गल्ल्या खूपच अरूंद आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणांचा अडथळा, तर काही ठिकाणी भूमिगत केबलचे जाळे अडथळा ठरते आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी महानगर गॅसचे एक खास पथक रहिवाशांशी समन्वय ठेवून काम करत असून, पुढील तीन महिन्यांत जास्तीत जास्त घरांमध्ये पीएनजी पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.