नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तानसा आणि मोडकसागर धरण आज () शुक्रवारी सकाळी पुर्ण क्षमतेने भरल्याने या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण 98.77 आणि मोडकसागर धरण 100 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
तानसा धरणातून 500.76 क्युसेक तर मोडकसागर धरणातून 134.76 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर बारवी धरण 68.10 तर भातसा धरण 79.84 टक्के भरले आहे. महत्त्वाच्या धरणांपैकी ठाणे जिल्ह्यातील तानसा आणि मोडकसागर धरण आहेत. शुक्रवारी सकाळी मोडकसागर आणि तानसा धरण ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता लवकरच मिटणार आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
तळ गाठलेला तानसा तलाव ओसंडून वाहू लागला असून मोडक सागर तलावही वाहू लागला आहे. तानसा धरणाची कमाल पाणी साठवण्याची क्षमता 145.08 दलघमी एवढी आहे. आजमितीस या धरणात 143.299 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मोडकसागर धरणाची क्षमता 128.93 दलघमी एवढी असून आज 128.925 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून मुंबईला दररोज ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.