मुंबई : राजेश सावंत
मुंबई महानगरपालिकेत एकत्र येण्यासाठी भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये मतभेद कायम आहेत. भाजपा मात्र एकत्र येण्यासाठी आग्रही असला तरी, आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित मुंबई विकास आघाडी स्थापन करण्यासाठी उत्सुक नाहीत.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काठावर पास झालेल्या भाजपा, शिवसेना महायुतीचे विविध समित्यांमधील सदस्य पदांचे गणित सुटण्यासाठी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे आवश्यक आहे. सोमवारी भाजपासह शिवसेनेने स्वतंत्र गट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आग्रही आहे. किमान राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना गटात सामील व्हावे, असे भाजपाचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गटनेते पद हवे असल्यामुळे त्यांच्या नगरसेविका डॉ. सईद खान यांनी शिवसेनेत दाखल होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता हा गट शिवसेनेत दाखल होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनेे स्वतंत्र गट स्थापन केला तरी अजून एक पर्याय महायुतीकडे आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन मुंबई विकास आघाडी स्थापन केल्यास त्यांच्या संख्येच्या आधारावर समिती सदस्यांची संख्या ठरवता येईल. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास प्रत्येक समितीमध्ये महायुतीचा एक सदस्य वाढणार आहे. पण मुंबई विकास आघाडी स्थापन केल्यास आघाडीचे सर्व निर्णय तिन्ही पक्षांना मान्य करावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षाचे स्वतंत्र मत राहणार नाही. शिवसेनाही आघाडीसाठी फारशी उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा तिढा कायम आहे.
मुंबई महापालिकेच्या समितीतील सदस्य संख्येवरून होणारा घोळ सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. तिन्ही पक्ष एकत्र आले तरच सुधार समितीमध्ये महायुतीचा एक सदस्य वाढेल. अन्यथा सत्ताधारी महायुती व विरोधकांची समसमान सदस्य संख्या राहू शकते. त्यामुळे सुधार समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लॉटरीच्या आधारावर अध्यक्ष ठरणार आहे. यात विरोधकही बाजी मारू शकतात. त्यामुळे एकत्र येऊन विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.