मुंबई : इंटरनेटसाठी सध्या अस्तित्त्वात असलेली यंत्रणा खरेदी करण्याची जबाबदारी काही टेलिकॉम कंपन्यांनी दाखवली आहे; यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाऊ नये, असे सेवा पुरवठादार कंपन्यांचे म्हणणे आहे.
आरे ते आचार्य अत्रे चौक या टप्प्यातील सर्व भुयारी मेट्रो मार्गांवर इंटरनेट सेवा देण्यात आली होती; मात्र आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अखेरच्या टप्प्यात इंटरनेट सेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील स्थानकांवर एअरटेल, वोडाफोन आणि जिओचे नेटवर्क उपलब्ध होते. मात्र नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त शुल्काची आकारणी केली जात असल्याचे कारण सांगून या कंपन्यांनी माघार घेतली होती.
त्यानंतर काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरू करण्यात एमएमआरसीएलला यश आले होते; मात्र यंत्रणा उभारणारी कंपनी आणि सेवा पुरवठादार कंपन्या यांच्यातील मतभेद कायम राहिले. यंत्रणा उभारणारी कंपनी कंत्राटातील अटी व शर्थी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे कारण सांगून एमएमआरसीएलने त्यांचे कंत्राट रद्द केले आहे.
यामुळे सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद झाली आहे. ही यंत्रणा नव्याने उभारण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. मात्र असे न करता विद्यमान यंत्रणा खरेदीची परवानगी द्यावी, असे सेवा पुरवठादार कंपन्यांचे म्हणणे आहे.