मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याचा मान शहर विभागाला मिळण्याची शक्यता आहे. यासाठी शहरातील भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका राजश्री शिरवाडकर व शीतल गंभीर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता कोणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी शनिवार सात फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शुक्रवार सायंकाळपर्यंत महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. परंतु उमेदवारी अर्ज भरेपर्यंत हे नाव जाहीर करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण यंदा भाजपाने शहर विभागातील महिला नगरसेविकेकडे महापौरपदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.
महापौर पदासाठी रितू तावडे, राजश्री शिरवाडकर, शितल गंभीर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, स्वप्ना म्हात्रे व तेजस्विनी घोसाळकर यांची नावे चर्चेत होती. परंतु मुंबई महानगरपालिकेत भाजपा-शिवसेनेचे बहुमत असले तरी, विरोधकांना थोपवण्यासाठी तेवढ्याच ताकतीचा महापौर असणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपाच्या झालेल्या कोअर कमिटीमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली.
मुंबई भाजपातील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली असता, तीन नावांना पसंती दर्शवण्यात आली यात रितू तावडे, राजश्री शिरवाडकर व शितल गंभीर यांची नावे आहेत. तेजस्विनी घोसाळकरसाठी काहीजण प्रयत्नशील होते. मात्र घोसाळकर या अलीकडेच भाजपात आल्यामुळे भाजपची रणनीती त्यांना फारशी ठाऊक नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचा अभ्यास असलेला व रोखठोक असणाऱ्या नगरसेविकेला महापौरपदी बसवण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे. विशेषत: शहर विभागातील शिरवाडकर व गंभीर यांची नावे आघाडीवर आहेत. दोघीही अनुभवी असून यात कोण बाजी मारणार याकडे दीड कोटी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नगरसेवकांचे मतही जाणून घेणार
उपमहापौर पदी कोण हवे यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. याबाबत लवकरच गटनेते अमेय घोले व माजी खासदार राहुल शेवाळे नगरसेवकांशी संवाद साधणार असल्याचे समजते. दरम्यान भाजपाबरोबर वाटाघाटी झाल्यानंतर शिवसेनेला मिळणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदासाठीही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. शिवसेनेला दोन वैधानिक दोन विशेष समिती मिळण्याची शक्यता आहे.
राजश्री शिरवाडकर
मुंबई महानगरपालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. 2017 मध्ये पुन्हा नगरसेविका झाल्या. महिला बालकल्याण समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. पालिका सभागृहातील चर्चेत सहभाग व रोखठोक बोलणे, पालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सुधार समितीच्या सदस्य पदीही होत्या. पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख, पती राजेश शिरवाडकर जिल्हाध्यक्ष आहेत.