मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा १२ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यात मान्सून लांबल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या दहा टक्के पाणीकपातीत आणखी दहा टक्के कपात करण्याचा विचार सुरू आहे. पावसाचा अंदाज घेऊन, हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील विहिरीतील पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. विहिरींचे पाणी वापरूनही मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्याच्या दहा टक्के पाणीकपातीत आणखी दहा टक्के कपात केल्यास दररोज ८०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे.
सध्या तलावांत असलेला पाणीसाठा जेमतेम महिनाभर पुरेल इतका आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीकपातीत वाढ केल्यास पाणीपुरवठा आणखी १० ते १५ दिवस अधिक पुरेल. म्हणजेच जुलैअखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. तोपर्यंत मान्सून दाखल होऊन, तलावातील पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांची आहे. त्यामुळे वाढीव पाणीकपातीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राखीव पाणी साठ्याचा वापर !
तलावातील राखीव साठ्यामध्ये सुमारे दीड लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असतो. त्यामुळे वेळ पडल्यास या राखीव साठ्यातील पाणी मुंबईत आणण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राखीव साठा वापरण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील तीन वर्षांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये)
१२ जून २०२४ - ८०,१३९
१२ जून २०२५ - १,३७,५१३
१२ जून २०२६-१,७०,५४१
शिल्लक पाणीसाठा (१२ जून )
मध्य वैतरणा- १३%
भातसा-११%
तानसा-०६%