मुंबई : वरळीतील शोभायात्रेत यंदा 90 जणांचे पथक शालेय गणवेशात वादन करणार असून हे विशेष आकर्षण असणार आहे. हे पथक यातून ‘मराठी शाळा वाचवा, मराठी शाळा वाढवा’हा संदेश देणार आहेत. तसेच लोकनाट्याच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.
शिवसह्याद्री फाउंडेशन आणि ‘आम्ही वरळीकर’ या संस्थेच्यावतीने ही शोभायात्रा आयोजित केली असून यंदाचे सोळावे वर्षे आहे. मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारून विश्वशांती प्रार्थना व विद्यार्थ्यांच्या सामूहिक महाराष्ट्र गीतांनी ही शोभायात्रा गुरुवारी ( 19 मार्च) सकाळी 7.30 वाजता जांबोरी मैदान, डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथून सुरू होईल. पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, जव्हार येथील तारफा नृत्य, आकर्षक गुढ्या आणि विविध सांस्कृतिक देखावे यामुळे वातावरण उत्साहाने भारावून जाणार आहे. याशिवाय ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ, बाईक रॅली, साई पालखी सोहळ्याची मिरवणूक, वारकरी भक्तिमय गजर, लेझीम पथक आणि भव्य ढोल पथक या आकर्षणांमुळे शोभायात्रेला विशेष रंगत येणार आहे.
जागतिक महिला दिनाचा सन्मान म्हणून यंदाची गुढी विभागातील प्रमुख महिलांच्या हस्ते उभारण्यात येणार आहे. यंदाचे वर्ष हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष मानाचे असल्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात येणार आहे.
नागरिकांनी मराठमोळ्या वेशात आणि भगवा ध्वज घेऊन या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय शंकर कदम आणि सरचिटणीस महेश खवणेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठी भाषा आणि मराठी
शाळांविषयी जनजागृती करण्याच्या
उद्देशाने ‘मराठी शाळा’ या विषयावर भव्य
रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना 50 हजार रुपयांहून
अधिक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.
मुंबई : मराठी शाळा, रोजगार आणि घरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त गुरुवारी (दि.19) मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सुमारे 30 हून संघटना सहभागी होणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक पवार यांनी सोमवारी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रा. डॉ. दीपक पवार म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या पारंपरिक स्वागत यात्रांना केवळ धार्मिक स्वरूप न राहता त्या मराठी नववर्ष म्हणून सर्वसमावेशक पद्धतीने साजऱ्या व्हाव्यात, या उद्देशाने मराठी नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही स्वागत यात्रा केवळ शोभायात्रा नसून मराठी माणसाच्या अस्मितेचे आणि ज्वलंत प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी एक अभिव्यक्ती असेल. आता हिंदू नववर्ष म्हणून संकल्पना रुढ होत आहे. त्याचे स्वरूप झगमगाट झाले आहे. मराठी संस्कृती व मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी माणसाला रोजगार मिळावा व त्यांना मुंबईत घरे मिळावीत, अशी अभ्यास केंद्राची भुमिका आहे. आज जे मुंबई हडप करीत आहे, त्यांनाच येथे घरे मिळत आहेत तर मुंबईत काम केलेल्या गिरणी कामगारांना शेलू व वांगणी येथे सरकार घरे देत आहे.
या स्वागत यात्रेला दादर शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र दालन येथून गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. यात्रेमध्ये सुमारे 500 जण तर 30 विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागीत होणार आहे. ही स्वागत यात्रा मीनाताई ठाकरे पुतळा, शिवसेना भवन, प्लाझा, दादर टीटी, हिंदमाता मार्गे ही यात्रा परळ येथील कामगार मैदानावर विसर्जित होईल.
कलाकारांनी दिले समर्थन
चिन्मयी सुमित, सुमित राघवन, प्राजक्ता हनमघर, विनायक कोळवणकर व वैभव मांगले यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या यात्रेला समर्थन दिले आहे. तसेच विविध शाळामधील विद्यार्थी यांचे लेझीम पथक व बँड पथके यात्रेत असणार आहेत. या स्वागत यात्रेत सर्वांनी सहभागी व्हाव असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राने केले आहे.