Mumbai Goa Highway Toll: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्णपणे तयार झालेला नसतानाही या मार्गावर तीन टोल नाके उभारण्याचे काम सुरु असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम अपूर्ण आहे, तर काही भागांत कामचं झालं नाही. अशा परिस्थितीत वाहनचालकांना तिहेरी टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोल नाके उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एका प्रवासात दोन वेळा टोल भरावा लागू शकतो. याशिवाय पुढील टप्प्यात लोहारे येथेही टोल वसुली सुरू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाक्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सिग्नल यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे.
रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असताना टोल वसुली सुरू करण्याच्या हालचालींमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रस्ता पूर्ण नसेल तर टोल का भरायचा?” असा सवाल आता सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे वाहनचालक त्रस्त आहेत.
दरम्यान, हा मुद्दा विधानपरिषदेतही उपस्थित झाला. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले की, मुंबई–गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नसताना टोल वसुली सुरू करण्यात येणार आहे. विशेषतः खारपाडा येथे टोल आकारला जात असल्याचा त्यांनी उल्लेख करत, रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल लागू करू नये अशी मागणी केली.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, मुंबई–गोवा महामार्गाचे काम १२ टप्प्यांत सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांनुसार काही भाग पूर्ण झाल्यानंतरही टोल वसुली सुरू करता येते. या संदर्भात प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
मात्र, अपूर्ण महामार्गावर टोल वसुलीचा निर्णय घेतल्यास कोकणातील नागरिक आणि वाहनधारकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.