मुंबई: गेल्या वर्षी एकट्या मुंबईत झालेल्या वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूकीत लूटली गेलेली रक्कम 22 हजार 500 कोटी रुपये असून पाच वर्षांत 52 हजार कोटींपेक्षा अधिक रुपये सायबर गुन्हेगारीत लुटले गेले, अशी धक्कादायक माहिती मुंबई दूरसंचार विभागाचे प्रमुख, अप्पर महानिर्देशक आशिष पाठक यांनी प्रेसक्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई दूरसंचार विभागाने संचार साथी अँप संदर्भात आयोजित केलेल्या या परिषदेत पाठक यांनी सांगितले की, गेल्याच वर्षी 1030 हेल्पलाईनवर आर्थिक फसवणुकीचे 30 लाख कॉल आले. त्यापैकी 55 हजार तक्रारीवर गुन्हे नोंदविण्यात आले.
या ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीमुळे 22 हजार 500 कोटींचे नुकसान झाले. संचार साथी अँपमुळे मोबाईल ब्लॉक करणे, तक्रार नोंदविणे सहज शक्य होते. त्यामुळे तक्रारदारांचे 8 हजार कोटी वाचाविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.
फसवणुकीत महाराष्ट्राचे प्रमाण 20 टक्के आहे. सर्वांत जास्त फसवणूक पैसे डब्बल करून देतो, यासाठी केलेल्या ऑनलाईन आर्थिक व्यवहारातील आहे. संचार साथी अँपमुळे नागरिकांना हरवलेले हँडसेट बंद करण्यास आणि फसवणुकीची तक्रार नोंदविणे सहज शक्य होत आहे.
ॲपवरील कॉल घटले
मुंबईत दररोज 300 कॉल यायचे. संचार साथी अँपवर नोंदणी वाढल्यापासून त्याचे प्रमाण 150 वर आले आहे. 2 बनावट कॉल सेंटर बंद करण्यात यश आले. संचार साथी अँपने बंद केलेल्या मोबाईल नंबरची यादी सर्व बँकांना दिली जाते.आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये पिडीतांनी तात्काळ राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 संपर्क साधावा असे आवाहन ही मुंबई दूरसंचार विभागाने यावेळी केले.
नवीन मोबाईल सिमसाठी बायोमेट्रिक
सरकार चालू सिम कार्ड धारकांची वैधता तपासते आहे. नियमानुसार एक व्यक्ती 9 पेक्षा जास्त मोबाईल सीम कार्ड घेऊ शकत नाही. येणाऱ्या काळात बायोमेट्रिक सिस्टमकडून कोड वर्ड मिळाल्याशिवाय नवीन सिमकार्ड विकत घेता येणार नाही.
नवीन मोबाईल टॉवरवर सोलर यंत्रणा लावली जाणार आहे. तसेच अभियांत्रिकी विध्यार्थ्यांसाठी देशात शंभर 5जी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या असल्याचे मुंबईचे अप्पर महानिर्देशक आशिष पाठक यांनी सांगितले.