कांदिवली: शासनाच्या माध्यमातून कोस्टल रोडचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. चारकोप सेक्टर 8 टर्जन पॉईंट येथे पुलाचे बांधकाम करून कोस्टल मार्ग जोडला जाणार आहे. या कामात कांदळवनातील शेकडो झाडे तोडली जाणार आहेत, तर काहींची छाटणी केली जाणार आहे. यामुळे निसर्गचक्र, वन्यजीव संरक्षण, नैसर्गिक विविधता धोक्यात आसल्याने पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी यांच्यासह चारकोप सेक्टर 8 विकास समिती सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कांदिवली चारकोपमध्ये म्हाडाची मोठी वसाहत आहे. वसाहती खाडी किनाऱ्याला लागून आहेत. या परिसरात कांदळवन मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या माध्यमातून वरळी ते दहिसर सुरु असलेल्या कोस्टल रोडचा मार्ग सेक्टर 8 च्या मुख्य मार्गाला पूल बांधून जोडण्यात येणार आहे.
या पुलासाठी तसेच स्थानिकांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी स्लीप रोड बांधण्यात येणार आहे. सदर पूल आणि स्लीप रोड बांधकामासाठी 30 फूट रुंद आणि 900 फूट लांबीपर्यंतच्या भागातील कांदळवनाच्या भागात पिलर टाकण्यात येणार आहेत. तसेच कोस्टल रोडला जोडणारा मार्ग खाडीत वर्तुळाकार फिरून जोडण्यात येणार आहे.
त्या भागात देखील पार्किंगसाठी इमारत बांधण्यात येणार असल्याचे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी यांना अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांदळवनात तसेच स्लीप रोडसाठी बांधण्यात येणाऱ्या मार्गासाठी एकूण 40 पिलर उभारण्यात येणार असल्याने सध्या रोडवर असलेल्या 100 हून अधिक पर्जन्य वृक्षांचे काय, याबाबत चारकोप सेक्टर 8 विकास समितीचे अध्यक्ष किशोर शेट्टी तसेच पर्यावरणासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या मिली शेट्टी यांनी तातडीने अधिकाऱ्यांना भेटून काम थांबविण्याची विनंती केली. दोन वेळा बैठका घेऊन चर्चा केली.
डिपार्टमेंटचे अभियंता वैभव गांधी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे शंकर कवठे यांनी कामासाठी सर्वच खात्यांच्या परवानग्या मिळाल्या असून जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
इमारतीला हादरे
फेब्रुवारी महिन्यात पायलिंगचे काम सुरु असताना बाजूला असलेल्या इमारतीला हादरे बसले. त्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड घाबरले. मिली शेट्टी आणि विकास समितीने तातडीने संबंधित अधिकारी आणि स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांना कळविले. त्यानंतर उपाध्याय यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन चर्चा देखील केली होती.