मुंबई: पश्चिम आशियायी देशातील युद्धजन्य तणावाचे कारण देत महानगर गॅस लिमिटेड कंपनीने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिकिलो २ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मंगळवारपासून मुंबई व आसपासच्या भागात सीएनजीचा दर ८६ वरून ८८ रुपये प्रतिकिलो झाला आहे.
या दरवाढीचा थेट परिणाम राज्यातील अंदाजे १३ लाख सीएनजी वाहन मालकांवर होणार आहे. त्यात मुंबई महानगर प्रदेशात ४ लाख ५० हजार पेक्षा जास्त ऑटो-रिक्षा चालक आणि ५० हजारांहून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सी सीएनजी धारक आहेत.
दरम्यान,रिक्षा-टॅक्सीची नवीन भाडे वाढ लागू केल्यानंतरच सीएनजी दरात वाढ केल्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.१ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सीसाठी नवी भाडेवाढ लागू करण्यात आली. ऑटोरिक्षाचे किमान भाडे १ रुपयाने तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे २ रुपयांनी वाढवण्यात आले.
मात्र त्याच रात्री महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील ४ लाख ५० हजार पेक्षा जास्त सीएनजी ऑटोरिक्षा चालक आणि ५० हजारांहून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सीधारकांना वाढीव दराने सीएनजी विकत घ्यावा लागणार आहे.
शिवाय अजून रिक्षा टॅक्सीचे इलेक्ट्रॉनिक मीटरचे रिकॅलिब्रेशन झालेले नाही. त्यामुळे जुन्या दराने रिक्षा-टॅक्सी चालकांना आपली वाहने चालवावी लागणार आहेत. त्यात वाहन चालकांचे नुकसान होत आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली आणि आसपासच्या भागांना गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅसनेही सीएनजीचे दर प्रतिकिलो ३.८९ रुपयांनी वाढवून ८६.९८ रुपये प्रति किलो केले होते. मुंबईत तीन महिन्यांपूर्वी सीएनजीचे दर प्रतिकिलो ८१ रुपये होते. त्यानंतर ८६ रुपये झाला होता.
रिक्षा-टॅक्सी संघटनांची नाराजी
इलेक्ट्रॉनिक मीटरचे रिकॅलिब्रेशन झाल्यानंतरच रिक्षा-टॅक्सी चालकांना आरटीओचे नवे दर प्रवाशांकडून आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशात नवीन दरवाढ झाल्यानंतर सीएनजीचे दर वाढवण्यात आले. त्यामुळे ८ रुपये फरकाने आमचे नुकसान होत आहे. हे योग्य नसल्याचे सांगत मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.