मुंबई : हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून, मुंबई क्लायमेट वीकमुळे हवामान बदल कृती कार्यक्रमाला वेग मिळेल. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून, भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीन आणि केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाचे संचालक मार्टिन क्रुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे व हवामान बदल विषयक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सी 40 सिटीज क्लायमेट लिडरशिप ग्रुप यांच्यातही हवामान बदल व शहरी उपाय योजना बळकट करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईसारख्या किनारी महानगराला हवामान बदलाचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, घरे पाण्याखाली जाणे, व्यवसाय ठप्प होणे आणि उपजीविकेवर परिणाम होणे ही परिस्थिती वारंवार दिसत आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम बांधकाम कामगार, फेरीवाले आणि शेतकरी यांच्यावर होत आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे कापणी केलेली पिके नष्ट होतात, ज्याचा मोठा आर्थिक व सामाजिक परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा व पीएम कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्राने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. यामुळे पीएम कुसुम योजनेतील महाराष्ट्राच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रसाठी आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली. जोशी म्हणाले की, मुंबई क्लायमेट वीक हा हवामान विषयक चर्चा कृतीत रूपांतरित होत असल्याचे प्रतीक आहे.