मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई सेंट्रल स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक एक्सप्रेस वांद्रे स्थानकावरून चालवल्या जात आहेत. आता अशातच कर्णावती एक्सप्रेस मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे स्थानकावरून आता चालवली जाणार आहे. शिवाय, 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस आता वांद्रे स्थानकावरून 20 डब्यांची चालवली जाणार आहे. पश्चिम रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी फलाटाची रुंदी जास्त नसल्यामुळे कर्णावती एक्सप्रेस आता वांद्रे रेल्वे स्थानकावरून चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्याशिवाय पश्चिम एक्सप्रेस आणि गोल्डन टेम्पल या दोन एक्सप्रेसही वांद्रे स्थानकावरून धावणार आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल स्थानकावर प्लॅटफॉर्म्स उपलब्ध नसल्यामुळे अनेक एक्स्प्रेस वांद्रे स्थानकावरुन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई सेंट्रल स्थानकावरून दोन वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. त्यातील एक वंदे भारत एक्सप्रेस 16 डब्यावरून 20 डब्यांची चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दुसरी वंदे भारत 20 डब्यांची चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मची रुंदी कमी आहे. प्लॅटफॉर्म क्र. 5 वरून पूर्वी 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात होती, परंतू त्या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे, तिथून सध्या एकही रेल्वे सोडली जात नाही.
अनेक रेल्वे इतर रेल्वे स्थानकांवरून चालवल्या जाणार असल्यामुळे स्टॉलचालकांचा व्यवसाय कमी झाला आहे.
मुंबई सेंट्रलहून वांद्रे टर्मिनसला गाड्या हलवल्यामुळे प्रवाशांना आणि स्टॉल चालकांनाही अडचणी येत आहेत.
पश्चिम एक्सप्रेस आणि गोल्डन टेम्पलसारख्या एक्सप्रेस हलवल्यामुळे स्टॉलचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
“निविदा सादर करताना, आम्ही स्टेशनवरून सुटणाऱ्या एक्सप्रेसच्या संख्येनुसार कोटेशन देतो. रेल्वे गाड्या हलवत आहे, त्यामुळे आमच्या कमाईवर परिणाम होत आहे,” अशी माहिती येथील एका स्टॉलचालकाने दिली.