मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधात बसलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या कामकाजात भाजपाला सहकार्य तर शिवसेना शिंदे गटाला असहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चांगलाच रंगणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा- शिवसेना महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली 25 वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकावर असला तरी त्यांनी सत्ताधारी भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन, दोस्तीचा हात पुढे केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभेमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिल्याचे दिसून आले. महापौर निवडीच्या वेळी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी फारसा गोंधळ घातला नाही.
मात्र उपमहापौर निवडीच्या वेळी गोंधळ घालत सभागृह डोक्यावर घेतले. एवढेच काय तर महापौर रितू तावडे यांच्या भाषणाच्या वेळी गप्प असलेले ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उपमहापौर संजय घाडी यांचे भाषण सुरू असताना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एवढेच काय तर, पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणाही दिल्या. एवढ्यावरच न थांबता, सभात्यागही केला.
दरम्यान यापुढे मुंबईच्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गट नेहमीच सहकार्य करेल, असे वक्तव्य गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. पण सभागृहातील सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेला कधीच सहकार्य राहणार नसल्याचेही त्यांच्यासह ठाकरेंच्या अनेक नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. पालिका सभागृहासह समितीच्या बैठकीत भाजपाला सहकार्य केले तरी शिवसेनेला सहकार्य राहणार नसून त्यांच्या प्रत्येक निर्णयावर व्यत्यय आणला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटही आक्रमक झाला असून ठाकरे नगरसेवकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे शिंदेंच्या नगरसेवकांकडून ठणकावून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिका सभागृह समित्यांच्या बैठकीत दोन्ही शिवसेनेमधील राडे मुंबईकरांना बघायला मिळणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आली असली तरी शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन भाजपाने केले आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकी दिवशी विरोधकांनी घातलेला गोंधळ यापुढे घालू नये, अशी विनंतीही भाजपाने केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखालीच गटनेत्यांची बैठक घेऊन, विरोधकांना विनंतीही करण्यात आल्याचे बोलले जात आहे.