मुंबई: बांगलादेशीय बोगस जन्मदाखल्याच्या आरोपामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना जन्म दाखल्यामध्ये बदललेले नाव नोंदवणे रखडले आहे. नाव बदलण्याच्या गॅजेटमध्ये उल्लेख असूनही जन्म दाखल्यातील नाव बदलण्यास महापालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी केंद्रांमध्ये नकार दिला जात आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जन्म दाखला वितरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. महापालिकेने सॅप अंतर्गत बेकायदेशीररित्या 87 हजार 347 जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणी भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
खोट्या दस्तऐवजांच्या आधारे चुकीची जन्म नोंदणी प्रमाणपत्रे प्राप्त करण्याच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. यामुळे नाव व आडनाव बदलण्यात सर्वसामान्य मुंबईकरांना पालिकेकडून नकार दिला जात आहे. पूर्वीचे नाव व आडनाव तसेच आताचे नाव व आडनाव याचा गॅजेटमध्ये उल्लेख केलेला असतानाही जन्मपत्रिकेवरील नाव बदलण्याचे अर्जही स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या नागरी केंद्रामध्ये नवीन जन्म व मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासह काहीजण स्वतःचे नाव व आडनाव बदलण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करतात. यात काही विवाहित महिलांचाही समावेश आहे.
लग्नानंतर बदललेले नाव गॅझेटमध्ये नोंद केल्यानंतर त्याची एक प्रत पालिकेमध्ये देण्यात येते. त्या आधारावर नाव व आडनाव बदलण्यात येते. पण आता मुंबईतील पालिकेच्या कोणत्याही नागरी केंद्रावर गेल्यानंतर नाव बदलण्यात येत नाही. एवढेच काय तर अर्जही स्वीकारला जात नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.
पासपोर्टही रद्द होऊ शकतात
मुंबई महानगरपालिकेने जन्म प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर त्याची माहिती तातडीने पासपोर्ट कार्यालयाला कळवावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये नोंदणी केलेल्या 87 हजार 347 जन्मपत्रिका रद्द झाल्यास या जन्म पत्रिका पासपोर्ट मिळवण्यासाठी सादर केल्या असतील तर पासपोर्टही रद्द होऊ शकतो.