ठाणे: भारतातील सर्वात व्यस्त विमानतळावरील दोन्ही रनवे नियोजित कामानंतर आता कार्यान्वित झाले आहेत. एअरलाइन्सना त्यांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करण्यास मदत व्हावी यासाठी भागधारकांशी सहा महिने आधीच समन्वय साधण्यास सुरुवात करण्यात आली होती.
या कामामुळे पावसाळ्यापूर्वीच सुरक्षितता, पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा आणि एकूण पायाभूत सुविधांची क्षमता अधिक प्रबळ झाली आहे.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे संचलित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपली वार्षिक रनवे देखभाल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाची कार्यात्मक सज्जता अधिक दृढ झाली आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या सहा तासांच्या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली.
यादरम्यान रनवे 09/27, 3448 मी. आणि रनवे 114/32, 2871 मी. यांची सखोल तपासणी करण्यात आली. आता हे दोन्ही रनवे पुन्हा पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत. या कामाचे नियोजन खूप आधीपासून करण्यात आले होते. एअरलाइन्सना त्यांच्या उड्डाणांचे वेळापत्रक आगाऊ समायोजित करता यावे, यासाठी मागील सहा महिन्यांपासून सर्व भागधारकांशी समन्वय साधण्यात आला होता.
दररोज 950 हून अधिक एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (एटीएम) हाताळणाऱ्या विमानतळासाठी अशी प्रतिबंधात्मक देखभाल अत्यंत महत्त्वाची असते. यामुळे रनवेच्या पायाभूत सुविधा सातत्याने सर्वोच्च सुरक्षा आणि कार्यान्वित मानकांची पूर्तता करतात, निचरा यंत्रणा अधिक प्रबळ होते आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या काळात विमानतळ ऑपरेशन्स सुरक्षित राहण्यास मदत होते.
नेटवर्क्सची कसून तपासणी
देखभालीच्या या कामामध्ये रनवेच्या पृष्ठभागाची दुरुस्ती, एअरफील्ड ग्राउंड लाइटिंग सिस्टम सबस्टेशन्सची इलेक्ट्रिकल तपासणी, रनवेवरील साचलेला रबर काढणे, पृष्ठभागावरील खुणांची रंगरंगोटी आणि मोठ्या प्रमाणावर निचरा यंत्रणांची स्वच्छता या बाबींचा समावेश होता. टेक्निकल टीम्सनी रनवेच्या छेदनबिंदूंची, 3,000 हून अधिक रनवे लाईट्सची आणि प्रकाश व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान व नॅव्हिगेशनल यंत्रणेला आधार देणाऱ्या महत्त्वाच्या केबल नेटवर्क्सची कसून तपासणी केली, ज्यामुळे विनाव्यत्यय कामगिरी सुनिश्चित करता येईल.