पवन होन्याळकर
मुंबई: अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीत मुंबई विभागातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आले आहे. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतील तब्बल ३९५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील किमान एका शाखेला एकाही विद्यार्थ्याने पसंती दिली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच या महाविद्यालयांतील असलेले विविध ३ हजार ३६५ शाखा-पर्याय पूर्णपणे रिक्त राहिले आहेत.
मुंबई विभागात अकरावीसाठी एकूण ४ लाख ७७ हजार २९० जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी पहिल्या फेरीअखेर २ लाख १२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली; मात्र प्रत्यक्षात केवळ ७६ हजार २१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
साधारणपणे पहिल्या फेरीतच सर्वाधिक प्रवेश निश्चित होत असतात. मात्र यंदा पहिल्याच फेरीत शेकडो महाविद्यालयांना विद्यार्थी मिळाले नसल्याचे चित्र समोर आले आहे. अजूनही मुंबई विभागातील ४ लाख १ हजार ७६ जागा अद्याप रिक्त आहेत.
दरवर्षी स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना दरवर्षी नव्याने मान्यता दिली जात असली, तरी विद्यार्थ्यांची मागणी नसलेल्या भागांतही महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
अनेक शाखांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी फिरकत नसल्याने रिक्त जागांची समस्या वर्षानुवर्षे गंभीर बनत चालली आहे. मुंबई शहर व उपनगरातील ११०, ठाण्यातील १३१, पालघरमधील ९७ आणि रायगडमधील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये किमान एका शाखेला एकही विद्यार्थी पहिल्या फेरीत मिळालेला नाही. अनेक महाविद्यालयात संपूर्ण शाखाच विद्यार्थ्यांविना राहिल्याचे दिसून आले आहे.
अनुदनित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित असे वर्गीकरण असलेल्या शाखानिहाय आकडेवारीनुसार १ हजार १५५ कला, ७८५ विज्ञान आणि तब्बल १ हजार ४२५ वाणिज्य शाखांचे पर्याय पूर्णपणे रिक्त राहिले आहेत. म्हणजे या शाखांमधील एकाही जागेसाठी विद्यार्थ्यांनी पसंती नोंदवलेली नाही. उपलब्ध जागांच्या संख्येमुळे सर्वाधिक फटका वाणिज्य शाखेला बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.