MPSC Drug Inspector Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती, ती तक्रारच मुळात बनावट असल्याची धक्कादायक कबुली तक्रारदार लोकेश पाटील आणि गौरव पाटील या दोघांनी दिली आहे. भविष्यात लवकर ही भरती होणार नाही, म्हणून पुन्हा परीक्षा व्हावी यासाठी हा पूर्ण बनाव रचल्याचे तक्रारदारांनी MPSC ला पाठवलेल्या नव्या ईमेलमध्ये स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र लोकसवा आयोगाने २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक पदासाठी ऑफलाईन परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाला १२ जूनला जाहीर झघला. तसेच १ ते २१ जुलै कालावधीत उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे २३ जुलै रोजी MPSC ला ईमेलद्वारे पेपर फुटीसंदर्भात एक तक्रार प्राप्त झाली होती.
या आरोपांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली. मात्र पेपरफुटीचे सर्व आरोप फेटाळले. तसेच तक्रार बोगस निकाल तर तक्रारदारावर कारवाईचा इशाराही दिला होता. संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
प्रत्यक्ष चौकशीपूर्वीच काल रात्री तक्रारदार लोकेश पाटील आणि गौरव पाटील यांनी MPSC ला पुन्हा एक ईमेल पाठवून संपूर्ण प्रकाराचा उलगडा केला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, "२० मार्च रोजी व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेली प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या २२ मार्च रोजीच्या मूळ प्रश्नपत्रिकेपेक्षा अगदी विपरीत होती. ती आयोगाची नसून एका टेस्ट सिरीजची (सराव) प्रश्नपत्रिका होती. ऋषिकेश गांगुर्डे याने याचा विपर्यास करून पेपर फुटल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. ऋषिकेश स्वतः परीक्षेत नापास झाला होता आणि भविष्यात लवकर औषध निरीक्षक पदाची जाहिरात येणार नाही याची कल्पना असल्यामुळे, ही परीक्षा रद्द होऊन परत व्हावी यासाठीच त्याने पेपर फुटल्याची अफवा पसरवली. महाराष्ट्र लोकसा आयोगाची किंवा आयोगाच्या अध्यक्षांची बदनामी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता आणि MPSC विरोधात त्यांची कोणतीही तक्रार उरलेली नाही."
२० मार्च रोजी कथित संभाषण घडले असल्यास, त्याची तक्रार २४ जुलैपर्यंत (म्हणजेच ४ महिने विलंबाने) का करण्यात आली, यामागील मूळ कारणांचाही तपास MPSC कडून केला जात आहे. MPSC मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल आलेला नवीन ईमेल आणि सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.