Devendra Fadnavis on Modi Government Political News
मुंबई: सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणची पंतप्रधान मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. एका नव्या दशकाची सुरुवात झालेली आहे. त्याचे एक वर्ष या सरकारने पूर्ण केले आहे. निर्णयक्षम सरकार असे या सरकारचे वर्णन करता येईल. मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजपप्रणित एनडीए सरकारने आज (दि.१०) आपला अकरा वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोदी सरकारने केलेली कामे व योजनांबद्दल माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने मागील ११ वर्ष मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केलेली आहेत. पावणे दोन लाख कोटींचे प्रकल्प सुरु झाले आहेत. सरकारच्या सहकार्याने ६ लाख कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. राज्याला ३० लाख घरे देण्याचा विक्रम मोदी सरकारने केला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा हा विक्रम ठरला आहे. ८१ कोटी लोकांना मोफत अन्न धान्य वितरीत केले जात आहे. १५ कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे.
रेल्वे नेटवर्कसह उडाण योजनेच्या माध्यमातून दीड कोटी भारतीयांनी विमान प्रवास केला आहे. स्वाभिमानाचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सिंदूर, मोदींच्या कणखऱ नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्याचा बदला घेतला. २४ हजार कोटींची संरक्षण सामग्री खरेदी made in india मधून आपण केली आहे.
अर्थव्यवस्थेत देखील मोठा बदल भारताने घडवून आणला आहे. कोरोना काळात देखील भारताने अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे काम केले आहे. ५२ कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचे कर्ज मिळाले आहे. २०१४ पासून एकलव्य विद्यार्थी संख्या वाढली आहे. मोदी सरकारच्या काळात लोकांमध्ये परिवर्तन झाले आहे.