मुंबई: मोतीलालनगर समूह पुनर्विकास प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यानंतर म्हाडा आणखी 4 पुनर्विकास प्रकल्प बांधकाम आणि विकास तत्त्वावर राबवण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवणार आहे. यात गोराई, चारकोप, जुनी एमएचबी कॉलनी आणि रामकृष्णनगर या वसाहतींचा समावेश आहे.
जुनी एमएचबी कॉलनी हा प्रकल्प 26 एकरचा तर तर रामकृष्णनगर हा प्रकल्प 6 एकरचा आहे. चारकोप आणि गोराई हे प्रत्येकी 200 एकरचे प्रकल्प असून यात प्रत्येकी साधारण 20 हजार घरे आहेत. मोतीलालनगरप्रमाणे हे प्रकल्पही बांधकाम आणि विकास संस्था नेमून राबवण्यासाठी म्हाडा लवकरच शासनाला प्रस्ताव पाठवणार आहे.
प्रस्ताव मंजूर झाल्यास मूळ रहिवाशांच्या पुनर्वसनासह म्हाडालाही मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होतील. मोतीलालनगर हा बांधकाम व विकास तत्त्वावर राबवला जाणारा मुंबईतील पहिला समूह पुनर्विकास प्रकल्प आहे. याच पद्धतीने अभ्युदयनगरचा पुनर्विकास केला जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया पार पडली आहे.
एमजीएन ॲग्रो प्रॉपर्टीज लिमिटेड या विकासकाची निवड निविदा प्रक्रियेतून करण्यात आली असून उच्चस्तरीय समितीने प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेच्या प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली.
त्यामुळे कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. वांद्रे रेक्लेमेशन, अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल आणि वरळीतील आदर्शनगर या प्रकल्पांसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे.