मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या शिरढोण प्रकल्पातील घरे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने भविष्यातील येथील घरांच्या किमती कमी करण्याचा विचार म्हाडा करत आहे. याबाबत सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शिरढोण प्रकल्पाला भेट दिली असता त्यांनीच ही माहिती दिली.
कोकण मंडळाने भंडार्ली, गोठेघर, खोणी, शिरढोण या ठिकाणी गेल्या काही वर्षांत हजारो घरे बांधली. भविष्यात खोणी, शिरढोण येथील प्रकल्पांमधून विरार-अलिबाग रस्ता जाणार असला तरी सध्या हे प्रकल्प महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपासून दूर आहेत. त्यामुळे या प्रकल्पांतील हजारो घरे वारंवार सोडत काढूनही विकली गेलेली नाहीत.
म्हाडाने या घरांसाठी प्रथम प्राधान्य योजना राबवत मागेल त्याला घरे देण्यास सुरुवात केली. मात्र तरीही खोणी, शिरढोण येथील प्रकल्पांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शिरढोण येथील घरे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. खोणी येथील गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 7 हजार 174 निवासी सदनिका व 152 दुकाने उभारण्यात येत आहेत.
सन 2018 मध्ये 2 हजार 32 सदनिका, सन 2021 मध्ये 2 हजार 16 सदनिका आणि सन 2025 मध्ये 1 हजार 12 सदनिकांची सोडतीद्वारे विक्री करण्यात आली आहे. सोडतीतील सुमारे 70 टक्के यशस्वी अर्जदारांना सदनिकांचा ताबा देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शिरढोण येथील गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 18 हजार 692 निवासी सदनिका आणि 342 दुकाने उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यल्प उत्पन्न गटातील 1 हजार 905 सदनिका सन 2018 मध्ये तर 5 हजार 227 सदनिका सन 2025 मध्ये सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिरढोण प्रकल्पात प्रस्तावित मॉल, शाळा, दुकाने, दवाखाना, व्यायामशाळा आणि इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.