

मुंबई: पेट्रोल-डिझेलसोबतच खाद्यतेलाची मागणी आणि त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दहा वर्षांत खाद्यतेल दुपटीने महागले आहे. त्यात शेंगतेलापासून ते सूर्यफुलापासून तयार केलेल्या सर्व खाद्यतेलांचा समावेश आहे. 10 वर्षांपूर्वी खाद्यतेलाचे सरासरी दर लिटरमागे 80 ते 100 रुपये इतके होते. ते आता 150 ते 220 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
सुमारे 25 वर्षांपूर्वी वर्षभरात 8.2 किलो प्रतिव्यक्ती मागे तेलाचा वापर होत होता. तो आता 19.7 किलो प्रतिव्यक्ती इतका वाढला आहे. म्हणजेच हे प्रमाण अडीच पटीने वाढले आहे. विकसित देशांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण कमी असले तरी भारताची लोकसंख्या लक्षात घेता.
खाद्यतेलाची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशांतर्गत उत्पादन अपुरे असल्याने इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांतून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करावे लागते. या आयातीतही दुपटीने वाढ झाली असून खर्च तब्बल 15 पटीने वाढला आहे.
देशात राज्यनिहाय खाद्यतेलाचा वापर सारखा नाही. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर होतो. उत्तर भारतात मोहरीचे तेल सर्वाधिक वापरले जाते. तर पश्चिम भारतात सोयाबीन तेलाचा वापर अधिक होतो. दक्षिण भारतात सूर्यफूल आणि शेंगतेलाचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो.