मुंबई: भायखळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९८२ मध्ये घडलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाचा तब्बल ४४ वर्षांनंतर सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. सरकारी पक्ष सबळ पुरावे सादर करू न शकल्याने न्यायालयाने ६७ वर्षीय वृद्ध मोहम्मद ऊर्फ सलीम अब्दुल दोराजीवाला याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी हा निकाल दिला.
११ ऑगस्ट १९८२ रोजी माझगाव येेथे ही घटना घडली होती. सदानंद शेट्टी हे आपल्या कुटुंबासह घरात बसले असताना सलीम आणि इतर दोघांनी खंजिराने सदानंद यांच्या कपाळावर आणि शरीरावर वार केले.
मध्यस्थी करायला आलेल्या श्रीनिवास या व्यक्तीवरही त्यांनी गंभीर वार केले होते. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न तसेच अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. सदानंद शेट्टी यांचा ९ नोव्हेंबर २०१६ रोजी, तर साक्षीदार अनुसया शेट्टी यांचा ७ फेब्रुवारी २०२५ रोजी मृत्यू झाला.
या खटल्यात अनेक साक्षीदार शोधूनही सापडले नाहीत. घटना घडली तेव्हा केवळ १२ वर्षांची असलेल्या एकमेव हयात साक्षीदार पुष्पलता हिने न्यायालयात साक्ष दिली. परंतु, घटनेला ४४ वर्षे झाल्यामुळे स्मरणशक्ती गमावल्याचे सांगत तिने आरोपीला ओळखण्यास नकार दिला.