Maratha reservation :
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत आज (दि. ३१) पुन्हा एकदा चर्चा झाली. या प्रश्नी काेणत्या स्वरुपाचा मार्ग काढता येईल यावरही चर्चा झाली. आता याप्रश्नी आज सायंकाळी महाधिवक्तांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास मत्रीमंडळ उपसमितीची पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण मत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मराठा सामाजाचे आरक्षण आंदोलन मुंबईत सुरु आहे. मुंबईकरांना त्रास होत आहे. हा जाणीवपूर्वक नाही. एका समाजाचे आपल्या मागण्यासाठीचे आंदोलन रास्तच आहेच. मराठा बांधव आंदोलन करतोय, ताे आता अन्य जनतेला त्रास होणार नाही, याची दक्षता घेईल, असा विश्वासही विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. विनाकारण आंदोलनास बदनामी करण्याचाही प्रयत्न केला जाण्याची शक्यता, अशी भीतीही विखे-पाटील यांनी व्यक्त केली.
मागील दहा वर्षांपूर्वी शरद पवार हेच सत्तेत होते. ते सलग मंत्रीपदावरही होते;मग त्यांनी या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही, असा सवालही त्यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण दिलं नसल्याने प्रचंड मोठी वेदना आहे. मुंबईत मराठा बांधवांची केवळ गर्दी झाली आहे, असे सरकारने समजू नये, तर वेदना समजावी. उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्य सरकारला दिला. ते आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा मोर्चा आणि आर क्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, "दोघे ठाकरे भाऊ आणि ठाकरे बँड चांगला आहे. पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. त्यांना ११ ते १३ आमदार निवडून दिले पण ते पळून गेले. लोकसभेला फडणवीसांनी त्यांचा गेम केला. विधानसभेला मुलाचा पराभव केला. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकालेलं पोरग आहे. घरी फक्त फडणवीस चहा पिऊन गेलेत तर मग पक्ष बरबाद झाला तरी चालतो," अशा शब्दात जरांगे यांनी राज ठाकरेंवर निशाना साधला.