मुंबई: मानखुर्द ते ठाणे खाडीपर्यंत १२०० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी तब्बल १४ कोटी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात मानखुर्द भुयारी मार्गात पाणी तुंबून स्थानिकांना होणारा त्रास कायमचा कमी होणार आहे.
मुंबईमध्ये पावसाळ्यात अंधेरी, मिलन, मालाड, दहिसर, खार, व मानखुर्द सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून जनजीवन ठप्प पडते. मिलन सबवे ते तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय म्हणून महापालिकेने येथे भूमिगत टाकी उभारून पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्गामध्ये पावसाळ्यात पाणी तुंबून, येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडते. याबाबत शेकडो तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याची दखल घेत मुंबई महापालिकेने भुयारी मार्गातील पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून पावसाळी पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे ठाणे खाडीपर्यंत १२०० मिमी व्यासाची पोलादी वाहिनी टाकण्यासह ३ हजार घनमीटर प्रति तास क्षमतेचे तीन उदंचन संच पावसाळी कालावधीसाठी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहेत.
त्यामुळे भुयारी मार्गातील तुंबणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होऊन येथील वाहतूक पावसाळ्यातही सुरळीत सुरू राहील, असा दावा महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून करण्यात येत आहे.अंधेरी सबवे येथेही पंपिंग स्टेशन अंधेरी सबवे येथे पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी नाल्यामध्येच मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
या अगोदरही पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जेथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार होते. तेथून कोस्टल रोड जात असल्यामुळे ते रद्द करण्यात आले मात्र आता नव्याने पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.