मुंबई

‘उत्तर पश्चिम’च्या मतमोजणीत फेरफार, पारदर्शकता नव्हती: आदित्य ठाकरे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला. तर शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर विजयी झाले आहेत. या निकालावरून ठाकरे गटाने अनेक प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आज (दि. १७) शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

निवडणूक आयोग म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या हातातील बाहुले

आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या हातातील बाहुले झाले आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पारदर्शकता नव्हती. मतांमध्ये फेरफार करण्यात आली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

निकालाविरोधात आम्ही कोर्टात जाणार

परब यांनी सांगितले की, उत्तर पश्चिम मुंबईतील निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्यात आला असून हा निकाल संशयास्पद आहे. या निकालाविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या गलथानपणामुळे मतमोजणीत गोंधळ उडाला. मतमोजणीत पारदर्शकता नव्हती. मतमोजणीनंतर १७ सी फॉर्म भरला गेला नाही, हा फॉर्म अनेकांना देण्यात आला नव्हता. मतमोजणी अधिकाऱ्यांकडून ६५० मतांची फेरफार करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

रविंद्र वायकर यांचे नातेवाईक फोन घेऊन मतमोजणी केंद्रावर

मतमोजणी केंद्रावरील अधिकारी कुणाशी तरी फोनवरून बोलत होते. मतमोजणी आधी आम्हाला कोणतीही सुचना देण्यात आली नाही. शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचे नातेवाईक फोन घेऊन मतमोजणी केंद्रावर गेले होते. त्यामुळे तेथील सीसीटीव्हीचे फुटेजची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही. निकालानंतर १० दिवसांनी गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. या १० दिवसांत फोन बदलले गेले, असेही परब यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT