मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठीचा तिढा सोडविण्यासाठी महायुतीत हालचाली सुरू आहेत. सध्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवर शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची चर्चा सुरू आहे, तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) वाटाघाटी सुरू आहेत.
या जागांवर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसला, तरी आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून यातून मार्ग काढू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
‘जवाहर बाल भवन’च्या नूतन वास्तूच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाच्या तिढ्यासोबतच ‘नीट’ परीक्षा आणि महागाईच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
विधानपरिषदेच्या 17 जगांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तर, मित्रपक्षांमध्ये जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आम्ही एकत्रित बसून यावर मार्ग काढू. अजून मार्ग निघालेला नाही; मात्र मला विश्वास आहे की मार्ग निघेल, असे फडणवीस म्हणाले.
यापुढील नीट परीक्षेत कोणालाही गडबड करता येणार नाही
नीट परीक्षेतील गैरप्रकारावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी या परीक्षेत मिठाचा खडा टाकून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला, त्यांनी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे.
केंद्र सरकार आणि परीक्षा प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली असून, संबंधितांना अटकही झाली आहे. पुढची नीट परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पार पडेल, यात कोणालाही गडबड करता येणार नाही, असे ते म्हणाले.
सध्याचे चित्र : भाजप 14, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1
फडणवीस यांनी तीन जागांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे विधानपरिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी 17 जागांबाबत 14 जागा भाजपला, 2 जागा शिंदे शिवसेनेला आणि एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या सूत्रावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.