मुंबई: राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि महायुतीचा डोलारा मजबूत असतानाच, आता घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी नेत्या सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई विमानतळावर उपस्थित होते. मात्र, या स्वागताला आणि त्यानंतर झालेल्या बैठकीला सुनेत्रा पवार न गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांचे संभाव्य फेरवाटप या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अशा महत्त्वाच्या बैठकीतून सुनेत्रा पवार गैरहजर राहिल्यामुळे महायुतीत सर्वकाही आटोक्यात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांच्याशी संपर्क ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेसला भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या सहभागाबाबत राष्ट्रवादी लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्ली अधिवेशनानंतर महायुतीची पुन्हा एक बैठक पार पडणार आहे. लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात प्रत्यक्ष बैठक होणार आहे. अशा एकूण चार बैठकांनंतर प्रशांत किशोर यांच्या भूमिकेबाबत आणि पक्षातील सहभागाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सूत्रांच्या मते, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाची रणनीती आणि निवडणुकीचे काम सोपवण्यासाठी आग्रही असल्याचे समजते.
एका बाजूला राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे पक्षांतर्गत बांधणीवरही भर दिला जात आहे. त्यानुसार, येत्या १० सप्टेंबरपर्यंत पक्षातील सर्व रिक्त पदे भरली जाणार असून, ज्या ठिकाणी गरज भासेल तिथे चेहऱ्यांमध्ये बदल केले जाणार आहेत. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही कंबर कसली असून, महायुतीमधील या नव्या घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.