नरेश कदम
मुंबई: विधानपरिषदेच्या 18 जागांपैकी 6 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडून बसले असल्याने या जागवाटपाचा वाद आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात पोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कांदा आणि इथेनॉल प्रश्नाबाबत बुधवारी दिल्लीत अमित शहा यांच्याकडे जात असल्याचे निमित्त असले तरी विधानपरिषदेच्या जागावाटपाचा वाद त्यांच्यापुढे मांडण्यात येणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसह विधानपरिषदेच्या 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. या अठरा ही जागांवर महायुतीचे मोठे संख्याबळ बघता महाआघाडीला कुठेही विजयाची संधी दिसत नाही. त्यामुळे महायुतीचे पारडे सगळ्याच जागांवर जड आहे.
या 18 जागांपैकी सहा जागांवर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. परंतु शिंदे यांना चार जागा देण्यास भाजप तयार आहे. मात्र शिंदे यांनी हा पर्याय धुडकावून लावला आहे. सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली.
Sunetra Pawar: आम्ही आता सावरलो आहोत त्यामुळे 'ते' खाते पुन्हा आमच्याकडे आले पाहिजेया बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पण सहा जागांवर शिंदे अडून बसले होते. त्यामुळे तोडगा निघाला नाही. त्यानंतर शिंदे यांची मनधरणी करण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण ते प्रयत्न निष्फळ ठरले.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळची बैठक संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र या बैठकीत ही तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवारी कांदा आणि इथेनॉलबाबतच्या बैठकीचे निमित्त साधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे भेटणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस आणि शिंदे यांच्यात अनेक विषयांवर मतभेद झाले आहेत. यावर समेट घडत नसल्याने उपमुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने दिल्लीत जावून अमित शहा यांची भेट घेत आहेत. खरात प्रकरणाने शिंदे खूप दुखावले गेले आहेत . यासह अन्य काही मुद्दे हे या दोघांमधील मतभेदाचे कारण ठरले आहे.
सहा जागांवर वाद
ठाणे -पालघर , छत्रपती संभाजीनगर- जालना, सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, नाशिक, यवतमाळ , परभणी- हिंगोली या सहा जागांवर शिंदे अडून बसले आहेत. यातील ठाणे पालघर, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर- जालना, परभणी- हिंगोली या पाच जागा भाजपला पाहिजे आहेत. तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड ही जागा सुनेत्रा पवार गटाला द्यायची आहे. पण यात कुठेही तडजोड करण्यास शिंदे तयार नसल्याचे कळते.