

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सदर खाते पुन्हा आपल्या गटाला देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते पण अर्थखाते देण्यास विलंब केला जात असल्याची नाराजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केली. सुनेत्रा पवार गटाच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली.
या बैठकीत बोलताना, सुनेत्रा पवार म्हणाल्या, आपल्याकडे अर्थखाते हे महत्वाचे खाते होते. पण अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्याने अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. पण आता आम्ही सावरलो आहोत त्यामुळे हे खाते पुन्हा आमच्याकडे आले पाहिजे.
तटकरे-भुजबळ चकमक
बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आम्ही पक्षासाठी मेहनत केली. टीका सहन करत आहोत, असे तटकरे म्हणाले. तेव्हा सगळ्यांच्या श्रमातून पक्ष मोठा झाला असल्याचे उत्तर भुजबळ यांनी दिले.
अजित पवार यांना कायम साथ देणारा तटकरे आता परका का झाला आहे? असा भावनिक प्रश्न तटकरे यांनी केल्याचे समजते. या बैठकीदरम्यान 10 जून रोजी होणारा पक्ष स्थापनेचा मेळावा कुठे घ्यावा यावरही चर्चा झाली. तो बारामतीतच घ्यावा असे तटकरे यांचे मत होते मात्र हा मेळावा मुंबईत घेणे उचित ठरेल असे काहींचे म्हणणे पडले.
मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नेमका कुठे घ्यायचा हे ठरवण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख या दोन्ही नात्यांनी मेळावा कुठे व्हावा हे त्या ठरवतील असे आज सर्व आमदारांनी मान्य केले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीकडे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मंगळवारी मुंबईत असूनही फिरकलेच नाहीत. खासदार पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांना लक्ष्य केले असताना बैठकीला पटेलांनी न येणे हा चर्चेचा विषय झाला आहे.
निधी व महामंडळ वाटप तोडगा
निधी वाटपाच्या तक्रारीची दखल घेऊन आमदारासंख्यनुसार निधी वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक खात्याला तसे निर्देश देण्यात येतील. विशिष्ट पक्षाला विशेष स्थान मिळणार नाही. त्याचबरोबर महामंडळ वाटपही आमदार संख्येनुसार अ,ब,क असे मंडळाचे वर्गीकरण करून प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत या बैठकीत काही चर्चा झाली का हे समजू शकले नाही.