मुंबई: महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्ट अप’ हब स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महिलांना उद्योजकांना वित्त पुरवठा, बाजारपेठ व व्यवसाय सहाय्यदेखील मिळवून देण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा सामंजस्य करार झाला.
महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील आणि उदैती फाऊंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
महिला उद्योजकता स्टार्ट अप हब राज्यातील स्टार्ट अप परिसंस्थेमध्ये समन्वय साधणारे व्यासपीठ म्हणून काम करेल. शासनाच्या विविध विभाग, परिसंस्था भागीदार आणि सहाय्यक संस्थांना एकत्र आणून महिला उद्योजकांसाठी संधींचे मार्ग अधिक सक्षम करण्याचे काम या हबद्वारे केले जाईल.
महाराष्ट्रातील महिला-नेतृत्वाखालील उद्योगांसाठी ‘अॅक्सेलरेटर मॉडेल’ तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राची गरज, वित्तपुरवठ्याची उपलब्धता, बाजारपेठीय दुवे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांशी समन्वय साधून उदैती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीला तांत्रिक सहाय्यही देणार आहे