मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात सरासरी ७५ टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून मुंबई, ठाणेसारख्या भागातील डिजिटायझेशनचे प्रमाण ५० टक्केंच्या आसपास आहे.
या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना सुधारित वेळापत्रकाची तत्काळ माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही सुधारित कार्यक्रमाची लेखी माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नव्या मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि मतदान केंद्रांचे पुनर्रचनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयोगाने हा सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याचे मानले जात आहे.
सुधारित वेळापत्रक
घराघरांत पडताळणी (बीएलओ भेटी) : ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण : १७ ऑगस्ट २०२६
मसुदा मतदार यादी प्रसिद्ध : २४ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याची मुदत : २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे : २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : २७ ऑक्टोबर २०२६