नवी मुंबई: राज्यातील २०४ शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल शाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, त्यांना तातडीने पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
ॲनिमिया (रक्तक्षय) ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
विभागामार्फत सध्या राज्यभरात 'ॲनिमिया निवारण कार्यक्रम' युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत अवघ्या दीड महिन्यात २०४ शाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५,८६८, तर ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२,४२०, तर ६ एकलव्य शाळांमधील १,३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ॲनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 'सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स' (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची एचबी पातळी तपासली जात आहे. या मोहिमेत ३७,९१९ विद्यार्थी आणि ४१,७०५ विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले.
विभागनिहाय तपासणीचा आढावा
नाशिक विभाग : १०४ शाळांमधील एकूण ४१,४६९ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यात ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१,३९३, तर २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९,२२७ आणि 3 एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ठाणे विभाग: ८१ शाळांमधील एकूण ३३,४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२,०५४ तर १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १०,८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अमरावती विभाग: अमरावती विभागात 8 शासकीय आश्रमशाळांमधील १,८८५ आणि ३ अनुदानित आश्रमशाळांच्या १,०१३ विद्यार्थ्यांच्या (एकूण २,८९८) एचबी पातळीची मोजणी करण्यात आली.
नागपूर विभाग: नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १,२९५ विद्यार्थ्यांच्या (एकूण १,८३१) हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
पूरक आहाराची सूचना
या तपासणी मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळले आहे, त्यांना तातडीने पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदिवासी विकास विभागाचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे