मुंबई: राज्यातील शिक्षण विभागाच्या उदासीन आणि विसंगत कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने 16 एप्रिल रोजी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी थेट संघर्षाची भूमिका जाहीर करत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक तणावाखाली सापडले आहेत. मार्च महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने शिक्षकांचे कर्जहप्ते थकले असून, दंड आणि व्याजाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे.
तसेच, गेल्या दोन ते सहा वर्षांपासून विविध देयके प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निधी उपलब्ध असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी व्यपगत झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मुंबईतील पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयाबाहेर दुपारी 3 ते 5 या वेळेत आंदोलन करण्यात येणार असून, राज्यभरातही विविध ठिकाणी आंदोलन होणार आहे.
राज्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, मागील महिन्याप्रमाणेच याही महिन्यात पगार वेळेवर न झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 10 एप्रिलपर्यंत वेतन न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. मात्र, तरीही सरकारकडून या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने शिक्षकांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, वारंवार इशारे देऊनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढत असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले.
शिक्षक भारती संघटनेची 17 एप्रिलला निदर्शने
मुंबईसह राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सलग दोन महिने विलंब होत असल्याने सर्व राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणींचे कारण देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काही महिन्यांपासून उशिराने होत आहे.
फेब्रुवारी 2026 चे वेतन 13 मार्चनंतर झाले. तर मार्च महिन्याचे वेतन बिल अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाही. शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निदर्शने करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.