SSC failed students Pudhari
मुंबई

SSC failed students: कमी विद्यार्थी, तरी नापासांची संख्या वाढली!

छ.संभाजीनगर, नाशिक, मुंबईत सर्वाधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण; गतवर्षीच्या तुलनेत पास विद्यार्थ्यांची संख्या राज्यात 35 हजारांनी घटली

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई: गुणपत्रिकेवरील ‌‘नापास‌’ हा शब्द हटवण्याची चर्चा सुरू असतानाच राज्यातील दहावीच्या निकालात या विद्यार्थ्यांची संख्येत यंदा वाढली आहे. राज्यभरात 15 लाख 42 हजार 472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 1 लाख 21 हजार 986 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 34 हजार 947 उतीर्ण विद्यार्थी कमी पास झाले आहेत. यंदा कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्येत उलट तब्बल 30 हजारांची भर पडली आहे.

गेल्यावर्षी 2025 मध्ये राज्यभरातील 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 91 हजार 146 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. यंदा 15 लाख 42 हजार 472 इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 35 हजार विद्यार्थी कमी उत्तीर्ण झाले आहेत, तर दुसरीकडे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 30 हजार 840 ने वाढून 1 लाख 21 हजार 986 वर पोहोचली आहे. कमी विद्यार्थी परीक्षा देऊनही अनुत्तीर्णांची वाढलेली संख्या शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय मानली जात आहे.

विभागनिहाय आकडेवारी पाहता राज्यातील सर्वच मंडळांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात गेल्या वर्षी 13 हजार 647 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते. यंदा ही संख्या वाढून 15 हजार 239 वर पोहोचली असून, 1 हजार 592 विद्यार्थ्यांची वाढ झाली. नागपूर विभागात 13 हजार 463 वरून 16 हजार 138 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

म्हणजेच 2 हजार 675 विद्यार्थ्यांची भर पडली. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक धक्का बसला. गेल्या वर्षी 13 हजार 207 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते; यंदा ही संख्या थेट 21 हजार 420 वर पोहोचली. म्हणजेच तब्बल 8 हजार 213 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

मुंबई विभागात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 943 वरून 16 हजार 259 इतकी झाली असून, 2 हजार 316 विद्यार्थ्यांची वाढ झाली. कोल्हापूर विभागात 4 हजार 41 वरून 5 हजार 835 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. म्हणजेच 1 हजार 794 विद्यार्थ्यांची वाढ झाली.

अमरावती विभागात गेल्या वर्षी 11 हजार 192 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते. यंदा ही संख्या 15 हजार 202 वर गेली असून, 4 हजार 10 विद्यार्थ्यांची वाढ झाली. नाशिक विभागात 13 हजार 709 वरून 18 हजार 941 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. म्हणजेच 5 हजार 232 विद्यार्थ्यांची यंदाच्या निकालात भर पडली आहे.

लातूर विभागातही मोठी घसरण दिसून आली. गेल्या वर्षी 7 हजार 629 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते. यंदा ही संख्या 12 हजार 353 वर पोहोचली असून, 4 हजार 724 विद्यार्थ्यांची वाढ झाली. कोकण विभागात सर्वात कमी अनुत्तीर्ण विद्यार्थी असले, तरी तेथेदेखील वाढ नोंदली गेली. गेल्या वर्षी 315 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते, तर यंदा 599 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. म्हणजेच 284 विद्यार्थ्यांची वाढ झाली. एकूण राज्यात गेल्या वर्षी 91 हजार 146 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते.

यंदा ही संख्या तब्बल 1 लाख 21 हजार 986 वर पोहोचली असून, एका वर्षात 30 हजार 840 विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. कमी नोंदणी आणि कमी उपस्थिती असूनही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा अधिक वाढली असल्याने याचीही चिंत्ता आता शाळांना करावी लागणार आहे.

12 हजार 554 विद्यार्थी परीक्षेपासून दूर

यंदा राज्यभरात 12 हजार 554 विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही या ना त्या कारणाने प्रत्यक्ष परीक्षा दिली नसल्याचे समोर आले आहे.मुंबई विभागात सर्वाधिक 2 हजार 179 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले, तर नाशिक विभागात 1 हजार 847, अमरावतीत 1 हजार 682, पुण्यात 1 हजार 664 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 1 हजार 658 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही. मात्र हे विद्यार्थी अनुतीर्ण संख्येत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT