मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील शासनमान्य कौशल्याधारित पदविका अभ्यासक्रम बंद करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा निर्णय लागू होणार आहे.
राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची कागदपत्र पडताळणी, संस्थांमधील पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष तपासणी आणि राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाच्या प्रपत्रात वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान, क्ष-किरण तंत्रज्ञान, औद्योगिक सुरक्षा, अंतर्गत सजावट व सजावटविषयक अभ्यासक्रम, अग्निसुरक्षा व औद्योगिक पर्यावरण अभियांत्रिकी तसेच मानवरहित विमान व ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमांची विद्यमान प्रवेशक्षमता असली तरी मंजूर प्रवेशक्षमता शून्य करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तत्काळ परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने संस्थांवर विशेष जबाबदारी टाकली आहे.
अभ्यासक्रम बंद झाल्यानंतरही विद्यमान तसेच माजी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असल्यास त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयाचा संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरही परिणाम होणार आहे. अभ्यासक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच त्यांना देय वेतन, वेतनभरपाई आणि अन्य आर्थिक देयके देण्याची जबाबदारी संस्थांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम बंद झाल्यानंतर कर्मचारी समायोजनाचा प्रश्न संस्थांसमोर निर्माण होणार आहे.
संस्थाचालकांच्या अडचणीत वाढ
अभ्यासक्रमाशी संबंधित गुणपत्रिका, उत्तरपत्रिका, निकालपत्रे, विद्यार्थ्यांचे पत्ते आणि शुल्काच्या पावत्यांसह सर्व दस्तऐवज तंत्रशिक्षण मंडळाकडे जमा करणे संस्थांना बंधनकारक आहे. संस्थेवर शासनाची थकबाकी असल्यास ती भरावी लागणार आहे.
अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या कर्जाची बाब भविष्यात निदर्शनास आल्यास त्याची परतफेड करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे. आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची जबाबदारी संस्थांवर टाकण्यात आली आहे.