ठाणे/मुंबई: सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात (एसआयआर) महाराष्ट्रातील सुमारे ७७.७७ टक्के मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असले, तरी अद्यापही राज्यातील तब्बल १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदार या प्रक्रियेबाहेर म्हणजे बेपत्ता असून, मुंबई शहर, उपनगरांतील तब्बल ३६ लाख ५९ हजार ८४७ मतदार आयोगाला सापडलेले नाहीत. ठाण्याचे २८ लाख ८८ हजार २४० आणि पालघरचे ६ लाख मतदार असेच गायब आहेत.
कोकणातील सुमारे ६७ लाख मतदारही निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला सापडले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
एसआयआर प्रक्रियेबाहेर राहिलेल्या मतदारांमध्ये प्रामुख्याने गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शहरी भागांमध्ये मतदारांची ही अनास्था अधिक असून, ठाणे, नागपूर, मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत प्रक्रियेबाहेर असलेल्या मतदारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम् यांनी स्पष्ट केले आहे.
कोकणातील सर्वाधिक मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यामध्ये २८ लाख ८८ हजार २४० मतदार बेपत्ता आहेत. पालघरमध्ये ६ लाख मतदार गायब आहेत. /...२
२१.१५ टक्के मतदारांची पाठ
राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख मतदारांपैकी उर्वरित २ कोटी ७ लाख म्हणजेच २१.१५ टक्के मतदारांची प्रपत्रे उपलब्ध न झाल्याने किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यास पात्र नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नावांचा समावेश ‘अनकलेक्टेबल ईएफ’ गटात करण्यात आला आहे.
राज्यात ‘लापता’ मतदारांचे गट
७५.५२ लाख आढळून न आलेले मतदार
७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित.
३४.८१ लाख मतदार मृत.
१७.६३ लाख मतदार अन्यत्र नोंदणीकृत किंवा दुबार.
२.२३ लाख मतदारांचा ‘इतर’ या वर्गात समावेश